धाराशिव (जिल्हा प्रतिनिधी सुरेश बागडे) – संपूर्ण राज्यभर परतीच्या पावसामुळे ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भूम-परंडा-वाशी तालुक्यातील सर्वत्र शेतकरी या परिस्थितीने संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने विशेष बाब म्हणून पाऊस किती पडला याचा विचार न करता, नेहमीचे निकष न लावता केवळ शेतकरी अडचणीत आहे, याचा विचार करून सर्व शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घोषित करावा,’ अशी मागणी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राज्यासह भूम परंडा वाशी तालुक्यातील मागील काही दिवसापासुन सतत पाउस सुरू आहे. पाउसामुळे ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील सर्वच शेतकरी संकटात सापडला आहे. हाता तोंडाशी आलेले मूग,उडीद व सोयाबीन चे मोठया प्रमाणात नुकसान झालेले असुन, सरकारने विशेष बाब म्हणुन कोणतेच निकष न लावता केवळ शेतकरी अडचणीत आहे. याचा विचार करून या तीन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करावा.
अतिवृष्टीमुळे शेतक-यांना मदत मिळणे बंधनकारक आहे.सतत पाउस सुरू असल्यामुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे हे मान्य करून शासनाने ओला दुष्काळ जाहिर करावा तसेच पंचनामे करण्याची औपचारिकता न करता केवळ पिक नोंदणी पाहून शेतक-यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. खरीपातील सोयाबीन, मुग, उडीद कपाशी आदी पिके गेलेले आहेत.शेतक-यांचे व शेतीचे फार मोठे नुकसान झालेले आहे. म्हणुन शेतक-यांना सावरण्यासाठी शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.’
अतिवृष्टीमुळे खरिपातील सर्व पिके वाया गेली आहेत. शेतकऱ्यांचे व शेतांचेही नुकसान झाले आहे. रोजंदारीवर रोजगार असणाऱ्या शेतमजुरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सततच्या पावसाने मातीच्या भिंती असणारी घरे मोठ्या प्रमाणावर खचली असून त्यांची पडझड झाली आहे. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी पंचनामे करून नुकसानीचा अंदाज घ्यावा,’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी शिवसेना युवा नेते रणजित ज्ञानेश्वर पाटील,शिवसेना नगरसेवक मकरंद जोशी, डॉ. आब्बास मुजावर,माजी नगरसेवक विनोद साळवे,शंकर जाधव,बुध्दीवान लटके, संतोष गायकवाड, प्रशांत गायकवाड, तुकाराम गायकवाड, धिरज हिवरे,दत्ता मेहेर, प्रितम डाके,रविकिरण चैतन्य, राजू पाटील, प्रकाश गायकवाड, प्रकाश सोनवणे, मारुती गोडगे,किरण शिंदे, अजिनाथ शेळके आदी उपस्थित होते.







