श्रीकृष्णजन्मभूमीची एक इंच भूमीही अवैध मशीदीसाठी सोडणार नाही !- अधिवक्ता विष्णु जैन

hindu-janjaran-samiti

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘श्रीकृष्ण जन्ममूभी मुक्तीचा संघर्ष’ विषयावर विशेष परिसंवाद !

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणी 12.10.1968 चा जो तडजोडीचा करार करण्यात आला होता, त्यावर श्रीकृष्णजन्मभूमी ट्रस्टने स्वाक्षरी नव्हती केली, त्यामुळे तो करार अवैध आहे. त्यामुळे जिल्हा न्यायाधीशांनी निकालावर म्हटले आहे की, भगवान आणि भक्त दोघेही या प्रकरणी खटला दाखल करू शकतात. तरी दिवाणी न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरून जिल्हा न्यायालयात खटल्याची सुनावणी चालू होईल. येथील 13.37 एकर भूमी ही पूर्ण भूमी श्रीकृष्णजन्मभूमीची आहे, त्यातील एक इंचही भूमीवर अवैध मशीद राहू शकत नाही. ती अवैध मशीद हटवायला हवी. श्रीकृष्णभूमीसाठी आमचा संघर्ष चालूच ठेवू, असे ठाम प्रतिपादन या प्रकरणी लढा देणारे सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता तथा हिंदु फ्रंट फॉर जस्टीसचे प्रवक्ता विष्णु शंकर जैन यांनी व्यक्त केले.

 

 

 

या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने घेतलेल्या ऑनलाइन विशेेष परिसंवादामध्ये भूमिका मांडतांना अधिवक्ता विष्णु जैन म्हणाले की, औरंगजेबाच्या लेखी आदेशानुसार सध्याचे मथुरा येथील मंदिर हेच श्रीकृष्णाचे जन्मस्थान असल्याचे लेखी पुरावे आजही उपलब्ध आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातही हिंदूंनी अनेक वेळा श्रीकृष्णजन्मभूमीचा खटला जिंकला होता. वर्ष 1951 मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी ‘श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर सेवा ट्रस्ट’ची अधिकृत स्थापना केली होती. तरी वर्ष 1956 मध्ये काँग्रेसच्या लोकांचा भरणा असलेल्या ‘श्रीकृष्ण जन्मभूमी सेवा संघ’ या खोट्या संघाची स्थापना करण्यात आली. या संघाने न्यायालयात ‘ही भूमी आम्हाला मिळाली’, अशी याचिका दाखल केली. पुढे या याचिकेवर न्यायालयात मुस्लीम पक्षकार आणि श्रीकृष्ण जन्मभूमी सेवा संघ यांच्यात तडजोड होऊन मूळ मंदिराची जागा मशिदीकडेच राहील, असा निकाल वर्ष 1968 मध्ये देण्यात आला. तो निकाल पूर्णत: अवैध आहे. पुरातत्त्व विभागाने श्रीकृष्ण मंदिराला लागून असलेल्या मशिदीच्या खाली खोदकाम केल्यास येथेही मूळ अवशेष निश्‍चितच मिळतील.

 

 

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘श्रीकृष्ण जन्ममूभी मुक्तीचा संघर्ष’ या विशेष परिसंवादाचा कार्यक्रम ‘फेसबूक’ आणि ‘यू-ट्यूब’ यांच्या माध्यमातून 19,677 लोकांनी प्रत्यक्ष पाहिला, तर 39,219 लोकांपर्यंत पोचला. या विषयावर #Reclaim_KrishnaJanmabhoomi हा ‘हॅशटॅग’ ट्विटरवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंडमध्ये होता.

 

 

 

….हा तर श्रीकृष्णजन्मभूमी आंदोलनाच्या लढ्यातील विजयाचा आरंभ !

श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणी दिवाणी न्यायालयात दाखल केलेली याचिका अयोग्य प्रकारे रद्द करण्यात आली होती, आता हीच याचिका जिल्हा न्यायाधीशांनी स्वीकारली आहे आणि खटला चालवण्यात येणार आहे. ही गोष्ट आमच्यासाठी अत्यंत आनंददायी आणि महत्त्वाची असून हा तर श्रीकृष्णजन्मभूमी आंदोलनाच्या लढ्यातील विजयाचा आरंभच आहे, अशी प्रतिक्रिया हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी या प्रकरणी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here