भाजपचे एकनाथ खडसे-गृहमंत्री अनिल देशमुख यांची रावेरात भेट
रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – बोरखेडा येथील पीडितेच्या कुटुंबीयांची गृहमंत्री अनिल देशमुख भेट घेण्यासाठी आले असता त्याचवेळी आज एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खडसेंना विचारले असता त्यांनी फक्त जय श्रीराम म्हणून रावेरकडे निघून गेले.
काल रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार भावंडांच्या हत्येमुळे समाजमन सुन्न झाले. सर्वत्र खळबळ उडाली आहे. कालच पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षाताई खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.
दरम्यान, आज (दि. १७) गृहमंत्री अनिल देशमुख हे पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी बोरखेडा येथे दाखल झाले आहेत. योगायोगाची बाब म्हणजे एकनाथ खडसे हे सुद्धा याच वेळी बोरखेडा येथे दाखल झाले. खरंतर ही राजकीय भेट नव्हे ; एका दुःखाच्या प्रसंगात हे दोन्ही नेते भेटत आहेत, पण या दोन्ही नेत्यांनी पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्याची साधलेली वेळ ही आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
मात्र, खडसे रावेरला जाण्यापूर्वी पत्रकारांनी घेरले असता ते म्हणाले की, ही घटना निंदा कारक आहे. एक आदिवासी कुटुंब यात भरडले गेले असून, संपूर्ण घटनेची चौकशी करून तात्काळ आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी करणार आहे. तर यावेळी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत विचारले असता त्यांनी फक्त जय श्रीराम म्हणून गाडीत बसून निघून गेले.







