खासदार नवनीत राणा यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देऊन नका, त्यांना तातडीने मदतीचा हात द्या असं न केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचीही टीका नवनीत राणा यांनी केली आहे. हवामान खात्याने सावध करुनही राज्य शासन गाफील राहिलं. पर्यायी उपाय योजना न केल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिसकावला गेला.
अत्यंत कष्टाने, श्रमाने व घाम गाळून पेरलेली पिकं कापणीला आली असताना निसर्गाची अवकृपा झाली. सोयाबीन, तूर मूग, उडीद, मका, कापूस, धान, ऊस इत्यादी पिकं शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत आडवी झाली. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. उद्ध्वस्त शेतकऱ्यांनी नैराश्याच्या गर्तेत जाऊन चुकीचे पाऊल उचलू नये, त्यांच्या कुटुंबांची दैना होऊ नये म्हणून किमान आता तरी सरकारने जागे होणे गरजेचे आहे असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
मागील ८ ते १० दिवसांपासून परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ झाला आहे. हवामान खात्याने सावध करुनही ठाकरे सरकार गाफील राहिले. पर्यायी उपाय योजना न करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे आता राज्य सरकारने त्यांना मदत करायला हवी अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे. तसंच या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देऊ नका अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असाही इशारा त्यांनी दिला आहे.







