सांगली (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांमध्ये १४ हजार २६७ लाभार्थी बोगस असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. अपात्र लाभार्थ्यांना ११ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी परत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तातडीने निधी परत न करणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत सांगली जिल्ह्यात ४ लाख ५८ हजार १९० लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांपैकी १ हजार ६६० अपात्र लाभार्थी व २२ हजार ६०७ आयकर भरणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांची यादी सरकारकडून पोर्टलवर जाहीर झाली आहे. अपात्र लाभार्थ्यांना घेतलेली रक्कम तात्काळ सरकारकडे जमा करावी लागणार आहे. या योजनेतून १ हजार ६६० अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर ८९ लाख ५४ हजार, तसेच १२ हजार ६०७ आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर १० कोटी ४६ लाख ६ हजार रूपये रक्कम जमा झालेली आहे. संबंधिताकडून तात्काळ रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर सूचना दिल्या आहेत. तालुकास्तरावर अपात्र लाभार्थ्यांना नोटिसा पाठवण्याचे काम सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
तालुकानिहाय अपात्र लाभार्थ्यांची संख्या व कंसात त्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम पुढीलप्रमाणे. आटपाडी १४ (६८ हजार रुपये), जत ४८ (३ लाख ४ हजार रुपये), कडेगाव १५९ (७ लाख १० हजार रुपये), कवठेमहांकाळ १२२ (५ लाख ५० हजार रुपये), खानापूर ३९ (२ लाख २२ हजार रुपये), मिरज ७६३ (४५ लाख २४ हजार रुपये), पलूस १८८ (८ लाख ५८ हजार रुपये), शिराळा २२ (१ लाख १२ हजार रुपये), तासगाव १८४ (९ लाख ८६ हजार रुपये), वाळवा १२१ (६ लाख २० हजार रुपये), अशा एकूण १ हजार ६६० अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यांवर ८९ लाख ५४ हजार रुपये रक्कम जमा झालेली आहे.
तालुकानिहाय आयकर भरणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांची संख्या व कंसात त्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम पुढीलप्रमाणे. आटपाडी १५४८ (१ कोटी २४ लाख ८४ हजार रुपये), जत १२०६ (९७ लाख ८८ हजार रुपये), कडेगाव १६०३ (१ कोटी ४४ लाख ६६ हजार रुपये), कवठेमहांकाळ ७१३ (५२ लाख ५४ हजार रुपये), खानापूर १६५६ (१ कोटी ३३ लाख ६२ हजार रुपये), मिरज १६४४ (१ कोटी २८ लाख १० हजार रुपये), पलूस ८६२ (७२ लाख ७६ हजार रुपये), शिराळा ७५१ (६९ लाख ४० हजार रुपये), तासगाव ११३३ (८७ लाख ५० हजार रुपये), वाळवा १४९१ (१ कोटी ३४ लाख ७६ हजार रुपये), अशा एकूण १२ हजार ६०७ आयकर भरणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरील १० कोटी ४६ लाख ६ हजार रुपये वसूल केले जाणार आहेत.
दरम्यान, सांगली जिल्ह्यात १४ हजारांहून अधिक बोगस लाभार्थी आढळल्याने राज्यभरात मोठ्या संख्येने बोगस लाभार्थ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.







