ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांच्या प्रयत्नांना मोठं यश येत आहे. गेल्या आठवड्यापासून कोरोना मृतांच्या व नवीन रुग्णवाढीची संख्या कमी होत असतानाच आज मात्र चित्र वेगळं आहे. आज कोरोनामुक्त रुग्णांपेक्षा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा अधिक आहे. त्यामुळं ही पुन्हा धोक्याची घंटा तर नाहीना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांच्या मानाने ऑक्टोबरमध्ये कोरोना उतरणीला आला होता. मात्र, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. आज राज्यात तब्बल ५ हजार ३६९ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे तर ११३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आज सापडलेल्या कोरोना रुग्णांमुळं राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १६ लाख ८३ हजार ७७५ इतकी झाली आहे.
राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २५ हजार १०९ इतकी आहे. पण, आता राज्यात कोरोनाची लाट ओसरत असतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ही ९० टक्क्यांच्या जवळ आहे. आज ३ हजार ७२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं राज्यात आत्तापर्यंत १५ लाख १४ हजार ०७९ कोरोनाबाधितांनी कोरोनाची लढाऊ यशस्वीरित्या जिंकली आहे. त्यामुळं राज्याचा रिकव्हरी रेट ८९. ९२ टक्के इतका झाला आहे.







