अलिबाग सोगांवकर – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी घरात शिरून अटक केली. त्यानंतर अलिबागच्या सत्र न्यायालयानं त्यांना 18 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गोस्वामी यांच्यासह इतर 2 आरोपींनासुद्धा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. फोरोज शेख आणि नितेश सारडा अशी इतर दोन आरोपींची नावं आहेत.
दरम्यान तिनही आरोपींनी त्यांना जामीन मिळावा यासाठी कोर्टात अर्ज केला आहे. त्यावर आपलं म्हणण मांडण्यासाठी कोर्टानं पोलिसांना वेळ दिलेला आहे. पण, कोर्टानं जामीन अर्जावरील सुनावणीसाठी निश्चित तारीख दिलेली नाही, आरोपींचे वकली सुशील पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
‘अ समरी’ रिपोर्ट मान्य झाल्यावर पुन्हा केसचा तपास करण्यासाठी न्यायालयाची मंजुरी घेतली नाही, पोलिसांवर असा ठपका ठेवत कोर्टानं पोलिसांना अर्णब गोस्वामी यांची पोलीस कोठडी नाकारली आहे.अन्वय नाईक आणि त्यांच्या आईचा मृत्यू या घटनेशी आरोपींचा थेट संबंध प्रस्तापित व्हायला हवा, तो पोलिसांना करता आला नाही. तसंच आरोपींची पोलीस कोठडी घेण्यासाठी सबळ पुराव्याची गरज आहे, असं म्हणत कोर्टानं पोलिसांना कोठडी देण्यास नकार दिला आहे.
अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रायगड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना अलीबागच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान बुधवारी (4 नोव्हेंबर) सकाळी अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या सरकारी कामात अडथळा घातल्याप्रकरणी त्यांच्यावर 353 कलमांतर्गत आणखी एक FIR दाखल करण्यात आली आहे.
आरोपीने अटक करताना सहाय्य केलं नाही, असं रायगड पोलिसांनी कोर्टात सांगितलं. तसंच बनावट डेबिट नोट तयार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.तसंच पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांच्या वकिलांनी कोर्टात केला. तसंच ही चौकशी अवैध असल्याचा दावासुद्धा गोस्वामी यांच्या वकिलांनी केला. त्यावर आरोपीने पोलिसांवर केलेल्या मारहाणीच्या आरोपांची तक्रार मी विचाराधीन घेत नाही. आरोपीने पोलिसांवर केलेले आरोप चुकीचे आहेत, असं कोर्टानं म्हटलं.
“अक्षता नाईक या सत्याला तोडून-मोडून मांडत आहेत. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेडशी (अन्वय नाईक यांची कंपनी) असलेला सर्व व्यवहार पूर्ण करण्यात आला असून, त्याचे कागदपत्रही आमच्याकडे आहेत,” असं अर्णब गोस्वामींच्या टीमने म्हटलं आहे. तसंच, “अक्षता नाईक यांना त्यांनी केलेल्या आरोपांचे कुठलेच पुरावे पोलिसांसमोर सादर करता आले नाही. त्यामुळे हे प्रकरण बंद झाले आहे. कुठलेही अवैध कृत्य झाले, याचे त्यांच्याकडे पुरावे नाहीत.”अक्षता नाईक यांनी सत्या चुकीच्या पद्धतीने मांडल्यास, चुकीचे दावे केल्यास किंवा ARG आऊटलायर मीडियाला लक्ष्य केल्यास बदनामी केल्याप्रकराणी कायदेशीर कारवाई करू,” असा इशाराही अर्णब गोस्वामींनी दिला होता.







