जळगाव (संपादक सुनिल पाटील) – जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा घसरला आहे. थंडीचा कडाका जिल्ह्यात वाढला असून गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा खाली येताना दिसत आहे. गेले दोन दिवस रात्री 10 अंशावर स्थिर असलेलं तापमान आता 9.5 अंशावर गेले आहे. त्यामुळे जळगावकर गारठले आहेत.
खान्देशात आता थंडीची लाट येत आहे. यात जळगाव व धुळे जिल्हा गारठला असून, नागरिकांमध्ये थंडीने हुडहुडी भरली आहे. येत्या काही दिवसांमध्ये पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. थंडीपासून बचाव होण्यासाठी शेकोट्या मात्र आतापासूनच पेटू लागल्या आहेत.
डिसेंबर महिन्यात थंडी आणखी वाढण्याची शक्यता असते. गेल्या वर्षी तापमान ७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. थंडीबरोबरच बोचऱ्या वाऱ्यांमुळे जळगावकर कुडकुडत आहेत. थंडीची लहर येत्या काही दिवसामध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे.







