नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – गोठीवली गांव, सेक्टर २९ सी या सेक्टर मध्ये लाईट जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहे. काही दिवसांपूर्वी येथे गटाराचे काम सुरू असताना इलेक्ट्रिक वायर तुटल्याने १०-१२ तास विद्यूत पुरवठा खंडित झाला होता. परंतु आज ऐन दिवाळी सणाच्या शुभ मुहूर्तावर येथील विद्यूत पुरवठा सायंकाळी ४ वाजल्यापासून खंडित झाला असून अद्याप सुरळीत झालेला नाही.
त्यामुळे ऐन दिवाळी सणाच्या दिवशी सुद्धा येथील नागरिकांना अंधारातच आपली दिवाळी साजरी करावी लागली आहे. याबाबत येथील नागरिक त्रस्त झाले असून प्रशासन या भागांमध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप येथील त्रस्त नागरिकांनी केला आहे.
याबाबत विद्युत विभागाचे गायकवाड यांच्याशी बोलणे झाले असता त्यांनी सांगितले की, गटाराचे काम चालू असताना वायर तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. फॉल्ट सापडला असून मध्यरात्री १२ पर्यंत विद्यूत पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परंतु यांच्या या नेहमीच्या कटकटीला जनता हैराण झाली आहे. यावर प्रशासनाने लक्ष देऊन ही समस्या नेहमी करीता दूर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.







