जळगाव (संपादक सुनिल पाटील) – हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध दाखल असलेल्या खासगी फौजदारी खटल्याप्रकरणी प्राथमिक चौकशी करून कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. या पोलिस तपासात कंगना रनौतने सहकार्य न केल्यास तिच्यावर कायदेशीर कारवाई शक्य असल्याचे असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडले.
आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलतांना उज्ज्वल निकम पुढे म्हणाले की, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कंगना राणावतला दोन वेळा समन्स बजावले. तरी ती गैरहजर राहिली. त्यानंतर पोलिसांनी आता कंगनाला तिसऱ्यांदा समन्स पाठवले आहे.
कंगना राणावत पोलिसांच्या समन्सला दाद देत नसेल किंवा पोलिसांना चौकशीकामी सहकार्य करत नसेल, तर पोलिस कोठडीची मागणी करू शकतात. पोलिसांना कोठडी मागण्याचा पूर्णपणे कायदेशीर अधिकार आहे. यात न्यायालयाच्या अवमानाचा प्रश्न येत नाही. कारण न्यायालयाने पोलिसांना कंगना विरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश दिले आहेत.
कंगनाने समन्सचे उल्लंघन केले तर पोलीस न्यायालयात जाऊन तिच्याविरुद्ध वॉरंट मागू शकतात. जेणेकरून पोलिसांना चौकशीसाठी पुढे मदत होऊ शकते. मुंबई पोलीस ऍक्ट आणि सीआरपीसीतील तरतुदीनुसार कंगनाविरुद्ध मुंबई पोलीस कारवाई करू शकतात.







