नवी दिल्ली – कोर्टाची पायरी चढू नये असा थोरामोठ्यांचा सल्ला आता राजकारणात पडू नये असाही ऐकायला मिळाला तर नवल नको वाटायला. हल्ली राजकारणावर किंवा एखाद्या विषयावर सोशल मीडियावर दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्यांमध्ये वादही होतात. आता अशाच एका राजकीय चर्चेमुळे ठरलेलं लग्न मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील एका उद्योगपतीचं सरकारी कर्मचारी असलेल्या मुलीसोबत ठरलं होतं. मात्र त्यांच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत असलेल्या मतभेदांमुळे दोघांनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील एका उद्योगपतीचं लग्न सरकारी कर्मचारी असलेल्या मुलीशी ठरलं होतं. संबंधित जोडप्याचं नाव प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही. दोन्हीकडचे लोक एका मंदिरात लग्नाच्या बोलणीसाठी भेटणार होते. स्थळ पाहण्यापासून ते अगदी लग्न ठरवण्यापर्यंत सर्व काही सुरळीत पार पडलं होतं. दरम्यान, दोघांपैकी कोणीतरी अर्थव्यवस्थेच्या मंदीचा विषय काढला. महिलेनं लग्न मोडण्यासाठी थेटं मोदीच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
सोशल मीडियावर ही या न झालेल्या लग्नाची चर्चा जोरात होत आहे. मोदींमुळे आता लग्नही होईनात अशा काही कमेंट कऱण्यात येत आहेत. तर सुशिक्षीत लोकांकडून अशा कारणांनी लग्न रद्द करण्याचा प्रकार न पटणारा आहे असं काहींनी म्हटलं आहे.







