फोटो काढण्याच्या नादात महिलेने गमावला जीव

harihar-gad

नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि.कुबेर जाधव) – त्र्यंबकेश्वरजवळील हरिहर किल्ल्यावर कुटुंबीयांसह फिरायला आलेल्या महिलेचा किल्ला चढतेवेळी फोटो काढताना पाय घसरून दगडावर पडल्यने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. मात्र, तेथील काही पर्यटकांच्या वक्तव्यांमुळे हा अपघात आहे, की आत्महत्या याबाबत संशय निर्माण झाला आहे.

 

राजूर बहुला (ता. नाशिक) येथील रुपाली ज्ञानेश्वर चौधरी (वय ३५) ही महिला आपल्या कुटुंबीयांसह खासगी वाहनाने निरगुडपाडा येथपर्यंत आली होती. त्यानंतर त्यांनी निरगुडपाडाच्या बाजूने किल्ल्यावर चढण्यास सुरुवात केली. किल्ल्यावर जाण्यापूर्वीच एका ठिकाणी फोटो काढत असताना या महिलेचा पाय घसरला आणि दगडावर आपटल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हरिहर किल्ल्याच्या परिसरात स्थानिक वन समिती, तसेच वनरक्षक आदी असतात. वनरक्षक दिवे आणि कर्मचारी यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली. प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी भदाणे, वनाधिकारी झोपे आदींनी या घटनेची दखल घेऊन तातडीने ही माहिती त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात कळविली, तसेच स्थानिकांच्या मदतीने संबंधित कुटुंबास धीर दिला. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने नोंद करण्यात आली असून, संबंधित महिला ही झारवड गावाच्या दरीत कोसळल्याने पुढील तपास घोटी पोलिस ठाण्यांतर्गत होणार आहे. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावर गेलेले कर्मचारी परतलेले नव्हते.harihar-gad

 

सदर महिला पाय घसरून पडल्याची नोंद पोलिसांनी केली असून, कुटुंबीयांसमवेत महिला फोटो काढत असताना पडल्याची माहिती पर्यटकांनी दिली. मात्र,ज्यावेळी वन व पोलिसांचे पथक पंचनामा करीत होते, त्यावेळी या महिलेने उडी मारल्याची चर्चाही काही पर्यटकांत सुरू होती. त्यामुळे या प्रकरणी संशय निर्माण झाला आहे. दरम्यान, हे क्षेत्र वन विभागाच्या अखत्यारित असले, तरी अपघात, की आत्महत्या याबाबतचा तपास पोलिस करीत असून, पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here