शहादा (तालुका प्रतिनिधी विजय निकम) – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील म.रा.प.मंडळ एसटी आगारातील वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे परंतु ही घटना आगर प्रमुखांच्या हेकेखोरपणामुळे घडली असल्याचा आरोप वाहकाच्या परिवारातील सदस्यांनी केला आहे . तसेच वाहकाच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
शहादा आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले यशवंत तुकाराम सोनवणे यांचा कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झाल्याने परिवारात दु:खाचे सावट पसरले आहे, तसेच एसटी आगारात कार्यरत असलेले इतर सदस्य देखील भयभयीत झालेले आहेत. आगारातील काही कर्मचाऱ्यांना मुंबई येथे कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याकारणाने तिथे ड्युटीसाठी पाठवण्यात येत मुंबई येथे कर्तव्य बजावून परत आल्यानंतर वाहकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले .त्यानंतर त्यांना नंदुरबार येथील कोविड सेंटर मध्ये भरती करण्यात आले परंतु त्त्यांची तब्येत अधिकच खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला म्हणून त्यांना नाशिक येथे नेण्यात आले परंतु तिथे त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यू झालेल्या वाहकाचे वय 52 वर्ष होते व त्यांना हृदयविकाराचा आजार असल्याचे समजते. तसेच याबाबतची माहिती वाहक सोनवणे यांनी आगारप्रमुखास दिली होती परंतु आगार प्रमुखांनी निलंबनाची धमकी देत कर्मचाऱ्यास मुंबईला जाण्यास भाग पाडले असल्याचा आरोप वाहकाच्या परिवाराने केला आहे.कोरोना काळात वयोवृद्ध व आजारी कर्मचाऱ्यांना कामावर पाठविण्यात येऊ नये याबाबत शासकीय धोरण असतांना देखील अनेक कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या दबावामुळे कामावर जावे लागत आहे .अशास अधिकाऱ्यांच्या हेकेखोर धोरणामुळे आज शहादा एस.टी.आगारातील वाहक यशवंत सोनवणे यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून वाहकाच्या मृत्यूस कारणीभूत असणारेयांवर कारवाई करावी अशी मागणी परिवाराने केली आहे.
याबाबत आगार प्रमुखांना विचारले असता त्यांनी आरोपांचे खंडन केले असून कर्मचाऱ्यांना कोणतीही जबरदस्ती केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठवण्या अगोदर त्यांची कोणतीही टेस्ट करण्यात येत नसून कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी सुरक्षा किट देखील उपलब्ध करून दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.







