मुंबई (संपादक सुनिल पाटील) – ‘सार्वजनिक जीवनात काम करत असताना समाजातील शेवटच्या माणसाच्या हिताची जपणूक करण्याचे काम मी मागील ५०-५५ वर्षे करतोय. हे काम करण्याची संधी मला महाराष्ट्राच्या जनतेने दिली. माझ्या कुटुंबाची आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची साथ त्याला लाभली, याबद्दल मी कृतज्ञ आहे,’ अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केल्या.


शरद पवार यांनी आज वयाची ८० वर्षे पूर्ण केली. त्या निमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह निवडक पदाधिकाऱ्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. यावेळी बोलताना शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘करोनाचा काळ असल्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम घेण्याचं मी टाळत होतो. पण जयंत पाटील यांनी एकाच ठिकाणी डिजिटल माध्यमातून राज्यातील सर्व नेत्यांना, कार्यकर्त्यांना एकत्र आणायची संकल्पना मांडली, त्यामुळं मला नाही म्हणता आलं नाही. आज पक्षातील माझे सर्व सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने डिजिटल माध्यमातून माझ्यावर त्यांच्या निस्सीम प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यानं मी भारावून गेलोय,’ असं ते म्हणाले.


‘आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनात मला पक्षातील तरुण पिढी पुढे दिसली. त्यांची ऊर्जा आणि उत्साह दिसला. सार्वजनिक आणि समाजकार्यासाठी नवी पिढी तयार होणे, ही राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगली बाब आहे,’ असं पवार म्हणाले.
‘स्वातंत्र्यपूर्व काळात गांधी-नेहरूंच्या विचारांची पताका घेऊन काम करण्याचं सूत्र माझ्या आईनं स्वीकारलं. ते करत असताना कौटुंबिक जबाबदारीसुद्धा कटाक्षानं पाळली पाहिजे, ही भूमिका त्यांनी आयुष्यभर निभावली.

त्यांच्याकडून आम्हाला जीवनाकडं बघण्याचा दृष्टिकोन लाभला, हे मी माझे भाग्य समजतो. ज्यांच्यापासून आपण शिकलो, त्या शिकवणुकीचे स्मरण आजच्या दिवशी करणं गरजेचं आहे. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं स्मरण आज अनिवार्य आहे. पण या महापुरुषांचा फक्त उल्लेख करून चालणार नाही तर त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपल्याला नेहमीच चालायचं आहे,’ असा संदेशही त्यांनी पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना दिला.







