लोणंद येथील डोंगर ग्रुपने साजरा केला विजय दिवस
नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तान सैन्याला धूळ चारून पाकिस्तानपासून बांगलादेश स्वतंत्र केल्याची घटना 16 डिसेंबर 1971 रोजी घडली. या विजय दिनाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचे औत्सुक्य साधून लोणंद (सातारा) येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या 41 सदस्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने तारकर्ली – मालवण समुद्रात सुमारे 321 फूट तिरंगा ध्वज फडकवून हिंदुस्थानी सैन्याच्या शौर्याला आगळा वेगळा सलाम करत समुद्रामध्ये विजय दिवस साजरा केला.
समुद्रातील पाण्यामध्ये कोणत्याही देशाचा 321 फूट लांब ध्वज फडकविण्याची पहिलीच वेळ आहे. असा दावा यावेळी करण्यात आला. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने तारकर्ली – मालवणचा समुद्र किनारा दणाणून गेला. अशाच पद्धतीने पीओके (पाकव्याप्त कश्मीर) बाबतीत देखील विजय मिळवून आनंद साजरा करण्याची संधी देण्याची भावना व्यक्त केली.
हिंदुस्थानी सैन्याने 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानमधील पूर्वी पाकिस्तान असलेल्या आताच्या बांग्लादेशाला स्वांतत्र्य मिळवून दिले होते. त्यावेळी पासुन 16 डिसेंबर रोजी दरवर्षी देशामध्ये विजय दिवस साजरा केला जातो.याचे औत्सुक्य साधून लोणंद (सातारा) येथील श्री भैरवनाथ डोंगर मॉर्निंग वॉक ग्रुपचे मार्गदर्शक सदस्य एव्हरेस्टवीर प्राजीत पररेशी यांच्या संकल्पनेतुन डोंगर ग्रुपचे संस्थापक शशिकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शेळके, हेमंत निंबाळकर, पोनि राजेंद्र शेळके, शंभूराज भोसले, रोहित निंबाळकर, वरुण क्षीरसागर, रविंद्र धायगुडे, पंकज क्षीरसागर, तानाजी धायगुडे, अनिल क्षीरसागर, राजेंद्र काकडे आदीच्या सहकार्याने तारकर्ली – मालवण येथील समुद्रामध्ये 321 फूट तिरंगा ध्वज फडकवला.
यात अन्वय अंडरवॉटर सव्हिसेसचे रूपेश प्रभू, अन्वय प्रभू, सुमंत लोणे, राजू परब, रशमीन रोगे, नारायण रोगे यांचे सहकार्याने तीन बोटी व एक स्पीड बोट द्वारे सुमारे तीन किलोमीटर समुद्रामध्ये गेल्यानंतर तिरंगा फडकवण्यात आला या उपक्रमासाठी अॅडव्हेचर फोटोग्राफर मेहुल ढवळे यांचे विशेष सहकार्य लाभले.







