आवक वाढल्याने कांदा १५ ते २० रुपये किलो

onion

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – नवीन कांद्याची सुरू झालेली आवक, सोबत जुन्या कांद्याची नियमित आवक आणि परदेशातून मोठ्या प्रमाणात येऊन पडलेला कांदा यामुळे मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा बाजारातील व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा भरून आहे. यामुळे आता कांद्याचे दरही पूर्वपदावर आले असून, आज घाऊक बाजारात नवीन आणि जुना दोन्ही प्रकारचा कांदा १५ ते २० आणि सर्वाधिक चांगला कांदा २० ते २२ रुपये किलो या दरावर खाली आला. तर परदेशी

 

कांद्याचे दर १० ते १५ रुपये किलोपर्यंत खाली घसरले. एकूणच आताची कांद्याची परिस्थिती पाहता कांद्याचे दर वाढण्याची शक्यता नसून, असलेले दरही काही प्रमाणात खाली येण्याची शक्यता घाऊक व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

 

वाशीतील घाऊक कांदा-बटाटा बाजारात दिवाळीपूर्वी ८० ते ९० रुपये किलोपर्यंत गेलेले कांद्याचे दर दिवाळीपर्यंत ४० ते ४५ रु. किलोपर्यंत आले. त्यामुळे सर्व सामान्यांना कांद्याच्या दरात मोठा दिलासा मिळाला. दिवाळीपासून सर्व ठिकाणाहून घाऊक बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. पूर्वी ५० ते ६० गाड्यांवर असलेली कांद्याची आवक आता ८० ते ९० गाड्यांवर आली आहे. सध्या नाशिक, पुणे, नगरपाठोपाठ इंदुरमधूनही कांद्याची आवक होत आहे. यात ५० टक्के नवीन कांदा आणि ५० टक्के जुना कांदा बाजारात येत आहे. त्याचबरोबर परदेशी कांदा येण्याचे प्रमाण २० ते ३० टक्के आहे. त्यामुळे कांद्याची मुबलक आवक बाजारात होत आहे. मात्र, त्या मानाने कांद्याला पुरेशी मागणी नसल्याने कांद्याचे दर खाली यायला सुरुवात झाली आणि आता हे दर घाऊक बाजारात १५ ते २० रुपये किलोपर्यंत आले आहेत.

 

आता सर्व ठिकाणाहून कांद्याची चांगली आवक बाजारात होत आहे. शिवाय शेतकऱ्यांकडेही आता बऱ्यापैकी कांदा आहे. त्यातच कांद्याची निर्यात बंदच आहे. त्यामुळे कांदा बाहेरही जात नसल्याने शेतकरी तो स्थानिक बाजार पेठेमध्ये पाठवत आहेत. त्यामुळे येत्या काही काळात तरी कांद्याची चांगली आवक होत राहणार आहे. त्यामुळे कांद्याचे दर आता तरी वाढणार नसल्याची माहिती कांदा बटाटा आडत संघाचे अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here