कवितांजली : पर्व 3 रे – पुष्प 7 वे मासिक ऑनलाईन कविसंमेलन कवितांजली
मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – समाज एक भाव भावनांचे जाल आहे. भावना अनेक प्रकारच्या असतात. समाजात वावरत असताना कवी प्रखर/ उत्कट भावना वेचतो आणि नेमक्या शब्दात व्यक्त करतो. कवीची शब्दरूप अभिव्यक्ती हीच कविता होते. कवीचे हे शब्द वाचकाच्या मनाला भावतात. वाचक सुखावतो असे उद्गार डॉ.लक्ष्मण शिवणेकर यांनी कवितांजलीच्या तिसऱ्या पर्वातील सातव्या मासिक ऑनलाईन कविसंमेलन प्रसंगी काढले.
विकास व संशोधन प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमापैकी एक “कवितांजली” अंतर्गत तिसर्या पर्वातील सातवे ऑनलाईन कविसंमेलन 20 डिसेंबर रोजी संपन्न झाले. भवन विकासक , मिरा भाईंदर भूषण २०१९ पुरस्काराचे मानकरी श्रीपत मोरे , उद्योजक शंकर जंगम , लायन दीपक मोरे, अॅड. अभिजित मोरे , प्रतिष्ठानच्या विश्वस्त आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षिका वसुंधरा शिवणेकर आणि कवितांजली कार्यक्रमाचे संप्रेरक व अध्यक्ष डॉ.लक्ष्मण माधवराव शिवणेकर हे मान्यवर कविसंमेलनासाठी ऑनलाईन उपस्थित होते.
कविसंमेलनाचे अध्यक्ष डॉ.लक्ष्मण माधवराव शिवणेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून संमेलनाची सुरुवात आपल्या “पिलं ” या कवितेच्या सादरीकरणाने केली. ग्वाल्हेर, बेंगलोर, नागपूर, अमरावती, नाशिक, लातूर, बार्शी, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, ठाणे पालघर आणि मुंबई परिसरातील चाळीस कवी सहभागी झाले. काळाच्या ओघात जीवनपद्धती कशी बदलत चालली आहे, रात्र संस्कृतीचे आकर्षण , पर्यावरणाचा ऱ्हास आणि आध्यात्म विषयक रचना सादर झाल्या. कवींनी प्रेम, सौंदर्य, सुख दु:ख विषयक आर्त भावना व्यक्त करणाऱ्या गेय तसेच मुक्तछंदातील भावस्पर्शी व आशावाद निर्माण करणाऱ्या आनंददायी रचना सादर केल्या. सहभागी कवींना सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. कविसंमेलनाचे संयोजन विजय म्हामुणकर व वसुंधरा शिवणेकर यांनी अतिशय परिश्रमपूर्वक सूत्रबद्ध केले. तसेच प्रसाद गाळवणकर यांनी तांत्रिक सहाय्य देऊन सुंदर केले. विजय म्हामुणकर यांनी सूत्रसंचालन केले. सर्वांचे आभार मानून येणाऱ्या नूतन वर्षानिमित्त कवितांजलीच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
या काव्यसंमेलनात डाॅ.लक्ष्मण शिवणेकर, अनंत जोशी, विजय म्हामुणकर , लक्ष्मण शेडगे , प्रदीप गुजराथी, सुलभा गोगरकर, विशाल कुलकर्णी, स्नेहा साळुंके , संध्या बनकर, सीमंतिनी जोशी, पद्मा बांडे, स्वाती गोखले, शामराव सुतार , किशोरी पाटील, सरोज गाजरे , चंद्रशेखर धर्माधिकारी, शांतिलाल ननावरे , वंदना बिरवटकर , सुभाष शहा, दया घोंगे, आशा दोंदे , विकास भावे, प्रज्ञा धाराशिवे, व्यंकटेश वाकडे, डॉ. श्रीनिवास आठल्ये, स्नेहा राणे, महेश कुलकर्णी, सुनंदा सोनार, डॉ. प्रफुल्ला सुखटणकर, वैभव उपासनी, मधुरा खाडे , रामचंद्र किल्लेदार, उषा राऊत, भाग्यश्री कुलकर्णी, वैभव कानिटकर , कवी सरकार, डॉ. मिलिंद शेंडे, कमलाकर गवळी , इंद्रजीत पाटील आदी कवी सहभागी झाले होते. पुढील कविसंमेलन 17 जानेवारी, 2021 रोजी होईल. त्यासाठी विषयाचे बंधन नाही असे घोषित करण्यात आले. कविसंमेलनाची सांगता राष्ट्रगीताने झाली.







