मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – वांद्रे येथे एका महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आयशा शेपन शेख (२४) असे मृत महिलेचे नाव असून, नैराश्यातून तिने हे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.
आयशा हिचा सहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यानंतर वांद्रे येथील नर्गीस दत्तनगर परिसरात ती वास्तव्याला होती. तिला विविध व्याधींनी ग्रासले होते. तसेच ती व्यसनांच्या आहारी गेली होती. त्यातून तिची मानसिक स्थिती बरी नव्हती.
आयशा हिच्याशी संपर्क होत नसल्याने तिची मैत्रीण आणि आई शनिवारी तिच्या घरी गेले. या वेळी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तीन दिवसांपूर्वी आयशाने गळफास घेतल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.







