नवी दिल्ली – नव्या कृषी कायद्यांविरोधात सध्या देशभरातील शेतकरी आंदोलन करत आहेत. जोपर्यंत हे कायदे रद्द केले जात नाहीत तो पर्यंत हे आंदोलन सुरुच राहिल असा इशारा शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. त्यांच्या या आंदोलनाला अभिनेत्री कंगना रणौत सातत्याने विरोध करत आहे. शिवाय जे सेलिब्रिटी शेतकऱ्यांना पाठिंबा देतायेत त्यांच्यावर देखील ती टीका करत आहे. अखेर संतापलेल्या शेतकऱ्यांनी यापुढे पंजाबमध्ये कंगनाचा एकही नवा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा तिला दिला आहे.
पंजाबमधील शेतकऱ्यांनी कंगना रणौतच्या चित्रपटावर बंदी घालण्याचा इशारा दिला आहे. कंगना सातत्याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना खलिस्तानी आणि दहशतवाद्यांशी करत आहे. आंदोलनात सामिल झालेल्या वृद्ध शेतकऱ्यांवर देखील ती टीका करत आहे. शिवाय जे सेलिब्रिटी आंदोलनात सामिल झाले त्यांच्यावर देखील ती सरकारच्या वतीनं निशाणा साधत आहे. असे आरोप करत संतापलेल्या शेतकऱ्यांनी यापुढे कंगनाचा एकही चित्रपट पंजाबमध्ये प्रदर्शित होणार नाही असा इशारा तिला दिला आहे.
शेतकरी आंदोलनातील एक आजी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या असून अभिनेत्री कंगना रणौतने त्यांची तुलना शाहीन बाग प्रकरणातील बिलकिस दादी यांच्यासोबत केली आहे. त्यामुळे कंगनावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. कंगनाने अलिकडेच या आजींसदर्भातील एक ट्विट शेअर केलं होतं. मात्र, त्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. सोशल मीडियावर सुरु झालेल्या ट्रोलिंगनंतर कंगनाने तिचं हे ट्विट डिलीट केलं आहे. मात्र, सध्या ट्विटरवर #DaadiSeMaafiMangKangana हा हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला आहे.







