ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – २०२० वर्षाला निरोप व २०२१ या नववर्षाचे स्वागत जगभरात सर्वजण जल्लोषाने करणार आहेत. मद्य प्राशन करत आनंद साजरा करणाऱ्यांचीही कमी नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे मात्र या मंडळींचा थोडा हिरमोड झाला आहे. पण त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. कारण त्यांच्यासाठी एका व्यवसायिकाने ‘झेपेल तेवढी प्या अन सुरक्षित घरी जा’, असा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये मद्यपीने मद्य प्यायल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी वाहन व चालकाची सोय करण्यात येणार आहे.
नववर्षाचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या मद्यपींना आवर घालण्यासाठी ड्रिंक अॅण्ड ड्राइव्हची कारवाई करण्यासाठी मोठा फौजफाटा प्रत्येक नाक्यावर तैनात करावा लागतो. मद्य प्राशन करून भरधाव वेगाने वाहन चालविणे, अपघात होणे, अशा दुर्दैवी घटना नववर्षाच्या स्वागताच्या दिवशीच घडतात. यंदा संचारबंदी असल्याने वेळेत घरी जाणे एवढेच आता मद्यपींच्या हातात आहे. आपल्या ग्राहकांनी सुरक्षित घरी जावे यासाठी घोडबंदर परिसरातील हॉटेल व्येवसायिकांनी हॉटेलमध्ये आलेल्या मद्यपींची मद्य घेतल्यानंतर त्यांना सुरक्षित घरी सोडण्यासाठी वाहने आणि वाहन चालक तैनात केले आहेत.
या उपक्रमामुळे ग्राहकाचे हित जपले जात आहे. ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह सारख्या गुन्ह्यापासून ग्राहक लांब राहणार आहेत. यामुळे अपघाताला आळा बसेल, रस्त्यावर मद्यपींचा धुमाकूळ थांबेल. हॉटेलच्या सुविधेमुळे ग्राहक जास्त मद्य प्रश्न केले तरीही त्याला सुरक्षित घरी जात येईल. त्यामुळे या संकल्पनेचे ग्राहक स्वागत करत आहेत.
मद्यपी वाहनचालकांना रोखण्यासाठी हॉटेल व बारमालकांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना वाहतूक पोलिसांकडून दिल्या जाणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मद्य पिण्याचा परवाना नसलेल्या ग्राहकांना मद्य पुरवू नये. दारू न पिणारा ड्रायव्हर आहे का, याची खारतजमा करुनच वाहन मालक व त्याच्यासोबत आलेल्या लोकांना मद्य द्यावे. ग्राहक दारू प्यायला असेल, तर त्याला वाहन चालवण्यास प्रतिबंध करावा. वेळप्रसंगी त्यांना रिक्षा-टॅक्सी आदी वाहनांची व्यवस्था करून द्यावी. शक्य असल्यास त्यांच्या गाडीसाठी पर्यायी चालक उपलब्ध करून द्यावा, असे हॉटेल मालकांना सांगितले जाणार आहे.







