नवी दिल्ली – केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीच्या सीमांवर गेल्या 38 दिवसांपासून शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. शेतकरी कायदा मागे घेण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान शनिवारी आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर ही घटना घडली आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या शेतकऱ्याचं नाव कश्मीर सिंह असं आहे. ते उत्तर प्रदेशच्या रामपूर इथले रहिवासी आहेत. कश्मीर सिंह यांनी गाझीपूर सीमेवरील एका शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी ठेवली असून त्यात त्यांनी आंदोलन सुरू राखण्याचं आवाहन केलं आहे. आपलं हे बलिदान व्यर्थ जाऊ नये. आपले अंत्यसंस्कार दिल्ली- उत्तर प्रदेश सीमेवरच केले जावेत, असं त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
यापूर्वी 16 डिसेंबर 2020 रोजी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ संत राम सिंग (वय -65) यांनी आत्महत्या केली होती. मृत्युपूर्वी त्यांनी पंजाबी भाषेत सुसाईड नोटही लिहिली असून शेतकरी आंदोलन हे अत्याचाराविरुद्ध आवाज असल्याचे त्यांनी म्हटलं होतं.







