
रायगड – स्वराज्य आणि सुराज्यासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा रायगड या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्याच अभिमानाचा केंद्रबिंदू असून, प्रेरणादायी वास्तू आहे. या गडाच्या सुधारणेचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. या कामाचे परिणाम आता दिसू लागले असून, गडावरचा हत्ती तलाव हा तब्बल 150 वर्षानंतर भरला अशी माहिती या प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. फेसबुकवर एक पोस्ट लिहून त्यांनी ही माहिती दिली.
प्राधिकरणाच्या माध्यमातून गडावर डागडुज्जी करण्याचं काम सुरू असून प्राचिन पद्धतीचा वापर करून त्या वास्तू जतन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आह अशी माहितीही त्यांनी दिली. खासदार संभाजीराजे म्हणाले, रायगडा वरील हत्ती तलाव पाण्याने भरला! जवळपास दीडशे वर्षानंतर तो पुर्णक्षमतेने भरला असेल, असे स्थानिक रहिवासी बोलत आहेत. असे क्षण जीवनात खूप कमी येतात! ज्याच समाधान आयुष्यभर लाभतं.
सर्व शिवभक्तांना सांगताना आनंद होत आहे, की रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून आपण जे काही काम हाती घेतले, त्याला यश येत आहे. हत्ती तलावाला अजूनही एक जागेत गळती आहे. पण त्या गळतीचा व्यवस्थित अभ्यास करून ती सुद्धा काढून घेतली जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे.
रायगडावर असलेल्या तलाव व टाक्यामध्ये वर्षानुवर्षे गाळ साचल्यामुळे त्यांची जलधारण क्षमता खुप कमी झाली होती. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय काळजीपूर्वक हा गाळ काढण्यात आला. तलावातून काढण्यात आलेल्या गाळाचे परिक्षण केले असता यामध्ये अनेक शिवपुर्वकालीन, शिवकालीन, व उत्तरकालीन ऐतिहासिक वस्तू व आवशेष मिळून आले. या वस्तूचा उपयोग गडावर संशोधन करण्यासाठी होणार आहे अशी माहिती रायगड विकास प्राधिकारणाने दिली आहे.







