मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – जातियवादी गुंडांनी केलेल्या मारहाणीत ४डिसेंबर २० रोजी मृत्यू पावलेल्या सांताक्रूझचा बौद्ध तरुण आकाश जाधवच्या पीडित कुटुंबाला दिड महिन्याच्या संघर्षा नंतर आज दि.२१ जानेवारी रोजी शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार ४ लाख,१२ हजार, पाचशे रुपयांचा धनादेश देण्यात आला.सदर धनादेश आकाशची आई श्रीमती सुप्रिया जयराम जाधव यांना मंजूनाथ शिंगे,पोलिस उपायुक्त झोन ८,बी.के.सी.वांद्रे, यांच्या कार्यालयात,प्रसाद खैरनार सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग, यांनी दिला.त्याप्रसंगी आकाशची बहिण अक्षता,जातीअंत संघर्ष समितीचे महाराष्ट्र निमंत्रक कॉ.शैलेंद्र कांबळे,बौ.पं.समिती गट प्रतिनिधी गणेश खैरे, प्रबोधन युवा संघाचे संदेश गायकवाड व पत्रकार दिपक पवार उपस्थित होते.
आकाश जाधवच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी व पीडित कुटुंबाला कायद्यातील तरतुदीनुसार मदत मिळावी म्हणून , गेले दिड महिना संघर्ष करणारे जातीअंत संघर्ष समितीचे कॉम्रेड सुबोध मोरे,कॉ.शैलेंद्र कांबळे, बौद्धजन पंचायत समितीचे लक्ष्मण भगत,गट प्रतिनिधी गणेश खैरे,बौ.पं.समिती शाखा क्रमांक २३४ चे सर्व प्रमुख कार्यकर्ते व वस्तीतील लढाऊ महिला यांच्या लढ्यामुळेच वरील मदत मिळाली आहे.
त्यासाठी दि.१८ जानेवारीला वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध धरणे आंदोलनही केले.तेव्हा निवासी जिल्हाधिकारी श्री विकास नाईक यांनी आंदोलनाच्या शिष्टमंडळाला दोन दिवसांत मदत मिळेल असे आश्वासन दिले व आणि वरील मदत देऊन ते पाळले.परंतू या खून प्रकरणातील आरोपी अजून मोकाटच आहेत.त्या सर्व आरोपींनाही त्वरित अटक करण्यासाठीही जिल्हाधिकारी व पोलीसांनी पुढाकार घ्यावा.अशी मागणी मान्यवर साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना करीत आहेत.त्यासाठी त्यांनी मा.मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांना खुले पत्रही दिले आहे.अशी माहिती जातीअंत संघर्ष समिहतीचे सुबोध मोरे( ९८१९९९६०२९) व शैलेंद्रकांबळे(९८२१६६०७२५) यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.







