पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – एल्गार परिषदेत हिंदू धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शर्जील उस्मानी याच्याविरोधात पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावणारे व दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप हरिभाऊ गावडे यांनी तक्रार दिली आहे.
30 जानेवारी रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे एल्गार परिषद हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये अलिगड मुस्लिम विद्यापीठातील तरुण शर्जील उस्मानी याने भाषण देताना भारतीय संघराज्य विरोधात व हिंदू समाजाविरोधात आपत्तीजनक व भडकाऊ विधान केले होते.
शर्जील उस्मानी याने आपल्या भाषणात ” आजचा हिंदू समाज पूर्णपणे सडलेला आहे. 14 वर्षाच्या जुनेदला चालत्या ट्रेनमध्ये 31 वेळेस चाकूचे वार करून मारले जात असताना त्यांना कोणी थांबवत नाही. अशाप्रकारे लिंचींग करून हत्या करणारी ही लोक घरी जातात. दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्यात येऊन मिसळतात आणि आणखी दुसऱ्या कोणाची हत्या करतात, असे वक्तव्य केले होते. त्याच्या याच वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.
शर्जील उस्मानीच्या या वक्तव्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या, भारतीय न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखवला, भारतीय संघराज्याचा अवमान केला म्हणून त्याच्याविरोधात कलम 153 (अ) अंतर्गत स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. तर, आमदार अतुल भातखळकर यांनीही एल्गार परिषदेच्या आडून जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव असल्याचा आरोप केला आहे. तसेच, हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याप्रकरणी व देशद्रोही वक्तव्य केल्याप्रकरणी उस्मानीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर स्वारगेटमध्ये अखेर गुन्हा दाखल झाला आहे.







