ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – लोकलमध्ये प्रवासादरम्यान विसरून राहिलेले 6 लाखाचे दागिने शोधून डोंबिवली आरपीएफने प्रवासी महिलेला हे दागिने परत केले आहेत.
कल्याणमध्ये राहणाऱ्या वर्षा राऊत ही महिला लग्न समारंभात ठाणे या ठिकाणी गेली होती. लग्न समारंभ आटपून वर्षा राऊत यांनी 7:35 च्या सुमारास ठाण्याहून लोकल पकडली. कल्याण स्टेशन बाहेर येताच वर्षा राऊत यांना आठवण झाली की त्यांची दागिन्यांनी बॅग लोकलमध्ये विसरली.
घाबरलेल्या वर्षा राऊत यांनी ही माहिती आरपीएफ 182 हेल्पलाइनला दिली. ही माहिती मिळताच डोंबिवली आरपीएफचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक हरफुल सिंह यादव यांनी पुढील प्रकिया सुरू केली. वर्षा राऊत ज्या लोकलने आल्या होत्या तीच लोकल ठाकुर्ली स्थानकावर सायडींगला उभी केली होती.
वर्षा या शेवटच्या महिला डब्ब्यात बसल्या होत्या. याबाबत माहिती मिळताच आरपीएफ उपनिरीक्षक आदेश कुमार प्रधान, आरपीएफ एम.बी. हिवाळे आणि किशोर येळने यांनी ठाकुर्ली स्थानकात जावून पिवळ्या रंगाची बॅग शोधून काढली. बॅग मिळाली आहे ही माहिती मिळताच वर्षा यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यानंतर डोंबिवली आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरफूल सिंग यादव यांनी वर्षा राऊत यांचे हरवलेले 6 लाखाचे दागिने परत केले आहेत.







