मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. कारण ऑनलाईन परीक्षा घेण्यास बोर्ड अनुकूल नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातर्फे दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीत दहावी-बारावीच्या परीक्षा कशापद्धतीने घ्यायच्या यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान या परीक्षा ऑफलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या परीक्षा ऑनलाईन होणार नाही, असे स्पष्ट दिसत आहे.
दहावी, बारावीची परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही. विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाही. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याबाबत बोर्डाचा आग्रह आहे. राज्यात सध्या दहावीचे 16 लाख, तर बारावीचे 14 लाख विद्यार्थी आहे.






