चोपडा (प्रतिनिधी संदीप ओली) – चोपडा येथे कोरोनाच्या भीतीपोटी भाजीपाला लिलावात व्यापारी बांधवांनी पाठ फिरवल्यामुळे आज बहुतांश भाजीपाल्याचा लिलाव झाला नाही. भाजीपाला विक्रेत्यांनी किरकोळ भावात मागणी केल्यामुळे आज आडगाव (ता. चोपडा) येथील दोन शेतकऱ्यांना आपले ४ क्विंटल टमाटे अक्षरशाः गाईंपुढे फेकावे लागले.
स्थानिक व्यापारी महामंडळाने कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बुधवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्या दिवशी भाजीपाला विक्रेते आणि ग्राहक बाजारपेठेत न आल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांची मोठी पंचाईत झाली. भाजीपाला लिलावात विक्रेत्यांनी किरकोळ भावात भाजीपाला मागितल्यामुळे चेतन गोविंदा माळी व मच्छिंद्र नामदेव पाटील या दोन शेतकऱ्यांनी प्रत्येकी दोन क्विंटल टमाटे गाईपुढे टाकून दिले.
आज चोपडा येथील भाजीपाला बाजारात पत्ता कोबी व टमाट्याला कवडीमोल भाव होता. टोमॅटो एक व दोन रुपये किलो प्रमाणे मागितल्याने शेतकऱ्यांनी संतापाच्या भरात गाईंना टमाटे खाऊ घातले. शेतकऱ्यांनी टमाटे फेकून दिल्याची माहिती आडत दुकानदार पुंडलीक महाजन आणि नरेश महाजन यांनी दिली. या व्यापारी बांधवांनी सांगितले की, आठ दिवसांपूर्वी टमाट्याला उठाव होता मात्र पुन्हा कोरोना वाढत असल्याने भाजीपाला लिलावात देखील मंदी जाणवू लागली. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी मेहनत करून पिकवलेले टमाटे गाईंपुढे टाकावे लागतात, हे मोठे दुर्दैवी आहे.






