मत नाही तर वीज आणि पाणी मिळणार नाही; सप्तग्रामच्या टीएमसी नेत्याने धमकावले

कोलकाता (पश्चिम बंगाल) – पश्चिम बंगालमधील निवडणुकीचे वातावरण चांगलच तापलं आहे. वाढत्या इंधन दरांविरोधात ममता बॅनर्जींचा रोड शो असो किंवा तृणमुल काँग्रेसच्या बड्या नेत्याने भाजपात केलेला प्रवेश असो. दररोज काही ना काही नविन ऐकायला मिळत आहे. पश्चिम बंगालचे कृषिमंत्री तपन दासगुप्ता यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मते न मिळाल्यास मतदारांना भयंकर परिणामांची धमकी दिली.

हुगळी येथील एका सार्वजनिक सभेत सप्तग्राम विधानसभेचे टीएमसीचे उमेदवार तपन दासगुप्ता यांनी मतदारांना सांगितले की ज्या भागात त्यांना मत मिळणार नाहीत त्या भागातील लोकांना “वीज आणि पाणी मिळणार नाही”.

डाव्या आघाडीच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून तपन दासगुप्ता २०११ मध्ये हुगळी येथील सप्तग्रामचे आमदार झाले. २०१६ च्या बंगाल निवडणुकीत त्यांनी सप्तग्राम जागा जिंकली होती. आता २०२१ च्या पश्चिम बंगाल निवडणुकीत दासगुप्ता यांना त्याच जागेची उमेदवारी देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत पक्षाला मत न दिल्यास तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवाराने मतदारांना गंभीर परिणामांची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी टीएमसीचे आमदार हमीदुल रहमान पश्चिम बंगालमधील मतदारांना धमकावताना पकडले गेले होते.

निवडणुकीनंतर विश्वासघात करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे हमीदुल रहमान यांनी दीनजपूर येथे जाहीर सभेत सांगितले होते. हमीदुल रहमान यांनी लोकांना टीएमसीला मत देण्यास सांगितले. ते म्हणाले की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारी फायद्यांचा आनंद लुटल्यानंतरही “विश्वासघात” करणारे लोक “देशद्रोही” म्हणून गणले जातील.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here