मुंबई लॉकडाऊनचा पहिला बडगा ‘नाइट क्लब’वर

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्याच्या अनेक भागांत करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. औरंगाबादमध्ये आठवडाभराचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर, अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनचा विचार स्थानिक प्रशासन करत आहे. मुंबईतही अंशत: लॉकडाऊन केले जाऊ शकते, असे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज दिले आहेत.

विधान भवनाच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते. ‘मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठिकठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. गरजेनुसार प्रशासनानं मर्यादित लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असं शेख यांनी सांगितलं. मुंबईत देखील रुग्ण वाढत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला बऱ्याच प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अजूनही बेफिकीरी दिसून येत आहे. मुंबईत तीन ते चार नाइट क्लबवर कारवाई झाली आहे. रुग्णसंख्या वाढत राहिल्यास सर्वात प्रथम मुंबईतील नाइट क्लब बंद केले जातील. त्यानंतरही रुग्ण वाढत राहिल्यास नाइट कर्फ्यू किंवा अंशत: लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही, असंही शेख यांनी सांगितलं.

‘मास्क न घालणाऱ्या नागरिकांना दंड केला जात आहे. मात्र, बेफिकिरी वाढत राहिल्यास समुद्र किनारे व गेटवे सारखी गर्दीची ठिकाणे बंद करावी लागतील. त्यामुळं लोकांनी काळजी घ्यावी,’ असं आवाहनही अस्लम शेख यांनी केलं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here