जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – कोरोनाची संपर्क साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि जनता कर्फ्युचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
जळगाव शहरातील व्यापारी आणि स्वंयसेवी संस्थांनीदेखील प्रशासनास सहकार्य करावे. कोरोना साखळी तोंडणे आणि संसर्ग कमी करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून त्यादृष्टीने जनता कर्फ्युचे पालन करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हा प्रशासनालादेखील सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करुन कोरोनाच्या विरुध्दच्या या लढ्यात आपला सहभाग नोंदवावा, असे पालकमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
हे असेल बंद
जनता कर्फ्यूमध्ये सर्व शाळा, कॉलेज आदी शैक्षणिक संस्था, बाजार, भाजीपाला दुकाने, सलून, सर्व खासगी कार्यालये, धार्मिक स्थळे, सार्वजनीक कार्यक्रम, किराणा दुकाने, नॉन-इसेन्शीयल या प्रकारातील सर्व दुकाने, दारू दुकाने, बगीचा, पानटपरी, हातगाड्या, सिनेमागृहे, व्यायामशाळा/जीम, तरणतलाव आदी सर्व बाबी बंद राहणार आहेत.
हे राहतील सुरू
जनता कर्फ्यूमध्ये वैद्यकीय आपत्कालीन सेवा, जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक, बस, रेल्वे व विमानसेवा; नियोजीत परीक्षा असणारी शाळा व कॉलेजेस, बँका व वित्तीय संस्था, कृषी केंद्र, गॅरेज, वर्कशॉप्स, कुरीयर, सर्व प्रकारची माल वाहतूक, कोविड लसीकरण, अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाठी पेट्रोल व डिझेल मिळणार आहे. तर शासकीय कार्यालयांमध्ये निम्मे उपस्थिती असावी असे या निर्देशांमध्ये सूचित करण्यात आले आहे. ज्यांना जनता कर्फ्यूमधून सुट दिलेली आहे त्यांनी आपापल्या आस्थापना वा सेवांची ओळखपत्रे सोबत बाळगावीत असेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.







