मुंबई (कार्यालय प्रतिनिधी) – विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत न्यूझीलंडकडून ३-२ने पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या स्थानावर घसरला असून भारतापेक्षा फक्त एका गुणाने मागे आहे.
इंग्लंड सध्या पहिल्या क्रमांकावर असून भारतापेक्षा सात गुणांनी पुढे आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये लवकरच पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार असून यावेळी भारताला हे अंतर कमी करण्याची संधी आहे.
दरम्यान टी-२० फलंदाजांच्या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच न्यूझीलंडविरोधात चांगली कामगिरी केल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे तर के एल राहुल पहिल्या स्थानावरुन तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली सहाव्या स्थानी कायम आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये भारतीय खेळाडूला मात्र स्थान मिळालेले नाही.






