मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील अशी राजकीय चर्चा जोरात सुरू आहे. दरम्यान आज मुंबईतील वायबी चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित आहेत. दरम्यान, मंत्री जयंत पाटील माध्यमांशी बोलताना मोठा खूलासा केला. ते म्हणाले की, मनसूख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे सुरू होता. या प्रकरणी सरकार कुणाला ही पाठीशी घालत नाही. गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा देणार अशा वावड्या उठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याबाबत कसलेही अंदाज बांधण्याची गरज नाही. शरद पवार आणि मुख्यमंत्री यांची भेट झाली ती पूर्वनियोजित होती. या भेटीवेळी दोघांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली, असं सांगितले.
ते पुढे म्हणाले की, अनिल देशमुख गृहमंत्री म्हणून व्यवस्थित काम करत आहेत. राष्ट्रवादीच्या बैठकीत गृहमंत्री बदलण्याबाबत प्रस्ताव नाही. मंत्रिमंडळातील बदलाबाबत कुठली चर्चा होणार नाही, असाही त्यांनी यावेळी खुलासा केला.






