दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरच, अर्ध्या तासाचा वाढीव वेळ

दहावी प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी गृहपाठ, बारावीसाठी 6 प्रात्यक्षिके

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – इयत्ता १०वी आणि १२वीच्या लेखी परीक्षा ऑफलाइनच होणार असून लेखी परीक्षेसाठी अर्ध्या तासाचा वेळही वाढवून देण्यात येणार आहे. तसेच लेखी परीक्षेचे केंद्रही त्याच शाळा व महाविद्यालयांमध्ये ठेवण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी स्पष्ट केले.

दहावीची लेखी परीक्षा यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे २९ एप्रिल ते २० मे, तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत होईल. दरवर्षी ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी ३ तास वेळ दिला जात असे. परंतु या वर्षी विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटे वेळ वाढवली आहे. ४० व ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटे वेळ वाढवली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येकी घड्याळी तासासाठी २० मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येईल.

१० वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात. मात्र यंदा त्या असाइनमेंट गृहपाठ पद्धतीने घेण्यात येतील. प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी विशिष्ट लेखनकार्य, गृहपाठ पद्धतीने २१ मे ते १० जून २०२१ या कालावधीत सादर करावे लागणार आहे.

बारावीसाठी ६ प्रात्यक्षिकांवर परीक्षा
बारावीच्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा २२ मे २०२१ ते १० जून २०२१ या कालावधीत होतील. कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रात्यक्षिकांचा सराव कमी असल्यामुळे बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून ५ ते ६ प्रात्यक्षिकावरच परीक्षा घेण्यात येईल व त्या संदर्भातील माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे देण्यात येईल, असेही गायकवाड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here