अमरावती (प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख एका सहायक पोलीस निरीक्षकाचा माध्यमातून महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करतात, असा खूलासा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. त्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात भाजपने ठाकरे सरकारविरोधात आंदोलन केले आहेत. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. अमरावतीत राजकमल चौक येथे भाजपच्यावतीने अनिल देशमुख यांच्यासह राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने राजकारण आणि पोलीस खात्याचे गुन्हेगारीकरण केले आल्याचा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी यावेळी केला. या सरकारमधले पोलीस बॉम्ब ठेवतात, या सरकारमधले पोलीस खंडण्या वसूल करतात, या सरकारमधले पोलीस लोकांना धमकावतात, लोकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतात या सरकारचा आम्ही निषेध करतो, असा आरोप शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे याचा पॉलिटिकल बॉस कोण आहे. हे शोधलं गेले पाहिजे, असे विधानसभेच्या पटलावरून म्हंटले होते. आज अनिल देशमुखच्या रुपात सचिन वझेच्या पॉलिटिकल बॉसची पहिली कडी उलडली आहे. या सरकरमधले आणखी कोण यामध्ये सामील आहेत. हे सगळं जनतेच्या समोर आलं पाहिजे. तसेच सरकारने आता नैतिक अधिकार गमावला असून अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला हवा. उद्धव ठाकरे यांच्याकडून सरकार सांभाळणे होत नसेल तर त्यांनीही खुर्ची सोडावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी राजकमल चौक येथे भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातूरकर, महापौर चेतन गावंडे, सुरेख लुंगारे, रविराज देशमुख, शिल्पा चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्तही लावण्यात आला.






