नवी दिल्लीतील राष्ट्रवादीच्या हाय व्होल्टेज बैठकीत अनिल देशमुखांवर झाला निर्णय

नवी दिल्ली – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली इथं एक हाय व्होल्टेज बैठक पार पडली. सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत होत असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अखेर राष्ट्रवादीकडून ठोस निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

जोपर्यंत अनिल देशमुख यांच्याविरोधात ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नाही, अशा प्रकारचा निर्णय आज दिल्लीत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीकडून घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वत: शरद पवार यांच्याकडे गृहमंत्र्यांनी राजीनामा देणे योग्य नाही असा सूर लावल्याची माहिती आहे. तसंच आपण भविष्यात गृहविभागाची जबाबदारी घेण्यास उत्सुक नसल्याचंही पाटील यांनी या बैठकीत सांगतल्याचं समजते.

अधिवेशनादरम्यान भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत ताकदीने ठाकरे सरकारवर टीका केली. खासकरून गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य केलं. तसंच विधीमंडळाबाहेरही अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता आपणही आक्रमक होत भाजपला जोरदार प्रत्युत्तर द्यायचं, अशी रणनीती राष्ट्रवादीच्या बैठकीत ठऱल्याची माहिती आहे. दरम्यान, आज दिल्लीत झालेल्या बैठकीत नेमकं काय ठरलं, याबाबत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून उद्या पक्षातील इतर नेत्यांना माहिती देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here