मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आणि खळबळजनक आरोपांची ज्युलिओ रिबेरो यांच्या सारख्या एखाद्या उत्तम अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे. मात्र ज्युलिओ रिबेरो यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात स्वारस्य नसल्याचे सांगितले आहे. राज्याच्या गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची करण्याबाबत कोणीही मला सांगितलेले नाही, आणि जरी सांगितले गेले तरी हे काम मी स्वीकारणार नाही, असे स्पष्ट मत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी व्यक्त केले आहे.
रिबोरो हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. अशा प्रकारचे काम करण्याचे आता माझे वय राहिलेले नाही आणि जरी मी ते काम करू शकत असेन तरी देखील मी ते काम स्वीकारणार नाही, असेही रिबेरो म्हणाले. या प्रकरणात ज्या प्रकारे पैशांच्या व्यवहाराबाबत बोलले जात आहे, सचिन वाझेसारख्या एन्काउंटर स्पेशलिस्ट आपल्याला एखादे पद मिळवण्यासाठी कशा प्रकारची लॉबिंग करतो हे सगळे पाहून अशा प्रकारच्या प्रकरणात मी स्वत:ला जोडू इच्छित नाही.
खुद्द शरद पवार किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली तरी आपण हे काम स्वीकारणार नाही का?, असा प्रश्न रिबेरो यांना विचारण्यात आला. मात्र त्यावरही रिबेरो यांनी ठामपणे नाही असेच उत्तर दिले. ही अतिशय अवघड अशी परिस्थिती आहे आणि ती कोणत्या दिशेला घेऊन जाईल याबाबत काही सांगता येत नाही. ज्या प्रकारे राजकारणाचा गोंधळ सुरू आहे त्याचा मला तिरस्कार आहे.
परमबीर सिंग यांना जर पैसे गोळा करण्याबाबत आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले जाते हे माहीत होते, तर त्यांनी गृहमंत्र्यांना भेटून याचा जाब विचारला पाहिजे होता. आणि हे रोखणे शक्य नसेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. मात्र त्यांनी तसे केले नाही, असे रिबेरो म्हणाले.






