मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येनं रुग्ण वाढू लागले आहेत. ही रुग्णवाढ सातत्याने ३ हजारांच्या वर असल्यामुळे प्रशासनासाठी ती चिंतेची बाब ठरली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जारी केलेली असताना आता मुंबई महानगर पालिकेने देखील काही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी येत्या रविवारी असणारा होळीचा उत्सव, तसेच त्यानंतर असणारा धुलिवंदन हा उत्सव खासगी किंवा सार्वजनिक अशा कोणत्याच ठिकाणी साजरा करण्यास मुंबई महानगर पालिकेकडून मनाई करण्यात आली आहे.
त्यासंदर्भातलं परिपत्रक पालिकेकडून जारी करण्यात आलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. तसेच, नियम मोडणाऱ्यांवर साथरोग कायदा १८९७, आपत्ती निवारण कायदा २००५ आणि भादंवि १८६० नुसार कारवाई केली जाईल, असं देखील या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.






