नाशिक (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून निफाडची ओळख सर्वदूर आहे. तालुक्यातील अनेक गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र यावर्षी उन्हाळा सुरू होताच नांदुर्डी येथील आदिवासी वस्तीत पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी येथील वाहती नदी ओलांडून पाणी आणण्याची वेळ आदिवासी महिलांवर आली होती.
नांदुर्डी येथील आदिवासी वस्तीला पाणीपुरवठा करणार्या पाण्याच्या लोखंडी टाक्या फुटून गेल्याने पाणी वाया जाऊन या वस्तीत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आदिवासी वस्तीला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करावा यासाठी आदिवासी महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध करत सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.
परिणामी ग्रामपालिकेने तातडीने याची दखल घेत तात्पुरता पाणीपुरवठा सुरू केला होता. त्यानंतर काही दिवसातच येथील पाण्याच्या टाक्या लोखंडी बॅरिकेट्स मुळे फुटून गेल्याने पुन्हा पाण्यासाठी महिलांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. या पाणीटंचाई बाबत ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती देऊनही कुठलीही दखल घेतली जात नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचे पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी गांधीगिरी मार्गाने शुभेच्छा देत आमच्या वसाहतीत पाण्याची सोय करा असा संदेश फलकातून या आदिवासी महिलांनी दिला.






