नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – फळांचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या आंब्याची आवक कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ मार्केटमध्ये सुरू झाली आहे. फळ मार्केटमध्ये १४ मार्चच्या रात्रीपर्यंत जवळपास ४५० गाड्यांची आवक झाली आहे.
महाराष्ट्रातून २३०३७ तर इतर राज्यातून ६५८२ क्रेट आंबा बाजारात दाखल झाला आहे. रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याची अधिक आवक बाजारात दाखल झाली आहे. बाहेरील सहा हजार क्रेटमध्ये कर्नाटक आणि केरळचा आंबा आहे.
आंब्याचा आगमनानंतर ग्राहकांची वर्दळ मार्केट परिसरात सुरू झाली आहे. सद्यस्थितीत देवगड हापूस पाच डझनाच्या पेटीला ८०० ते २५०० हजार रुपये भाव आहे. तर कर्नाटक आणि केरळ आंबा १०० ते १५० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. रत्नागिरी हापूस आंबा बाजारात दिवसेंदिवस वाढत चालला असून लवकरच आंबा सामान्य नागरिकांच्या आवाक्यात येणार असल्याची खात्री व्यापाऱ्यांकडून दिली जात आहे. त्यामुळे आंबा आवक जास्त प्रमाणात आली तरी मालाला उठाव राहणार असून सामान्य माणूस दहा दिवसात आंबा खाऊ शकेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.






