मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – राज्यात कोरोनाचा उद्रेक होतांना दिसत आहे. मुंबईसह पुणे, नागपूर, नाशिक, जळगाव या शहरांमधील रुग्णसंख्येचा वाढता आकडा चिंतेत भर टाकणारा आहे. मात्र, असं असतानाही नागरिक अजूनही बेजबाबदार वागत असून, या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहात नाहीत. या बेजबाबदार लोकांचा हलगर्जीपणा वारंवार समोर येत आहे. मुंबईतील एका पबमध्ये पोलिसांनी गुरुवारी रात्री छापा मारला असता अशीच एक बाब समोर आली आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहाता मुंबई पोलिसांनी कोरोना नियमांचं उल्लंघन होत असल्याचा संशयात गुरुवारी रात्री मुंबईतील पबमध्ये छापेमारी केली. या छापेमारीनंतर 230 जणांवर कारवाई आणि पब मालकांवर गुन्हा दाखल केला आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, यात 180 ग्राहक आणि 50 पब कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पब रात्री निर्धारित वेळेनंतरही उशिरापर्यंत सुरुच असल्याचं पाहायला मिळतं आहे. याशिवाय सोशल डिस्टन्सिंगचं तसंच मास्कचा वापर न करणं असे प्रकारही घडतं असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. याच कारणामुळे गुरुवारी मुंबईच्या विले पार्लेमधील पबवर छापेमारी करण्यात आली. कोरोना नियमांचं पालन न केल्याच्या आरोपात यावेळी अनेकांवर गुन्हा दाखल केला गेला. मुंबईतील ही अशी पहिली घटना नाही. याआधीही अनेकदा कोरोनाचे नियम पायदळी तुडवणं आणि निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ पब सुरू ठेवणं, यासाठी पोलिसांनी अनेक पब मालकांवर आणि ग्राहकांवर कारवाई केली आहे.






