पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरी आणि अखेरची वनडे लढत पुण्यात सुरू आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडला ३३० धावांचे लक्ष्य दिले आहे. मात्र या सामन्यादरम्यान एक सोपा कॅच सोडल्यानंतर हार्दिकने हात जोडत, जमिनीवर बसून सर्वांची माफी मागितली.
भुवनेश्वर कुमारने १४ धावसंख्येवर जेसन रायची विकेट घेत इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर जॉनी बेयरस्टोला बाद करत इंग्लंडची अवस्था २ बाद २८ केली. बेयरस्टोच्या जागी आलेल्या बेन स्टोक्सने डावातील ५व्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर मिड ऑनच्या दिशेने हवेत शॉट मारला. तेथे उभा असलेल्या हार्दिकला एक सोपा कॅच घेण्याची संधी होती. पण हार्दिकने तो कॅच सोडला.
These reactions will tell you how shocking that drop was 😶 Hardik drops a dolly, stokes catch of Bhuvi. pic.twitter.com/A1ajYSEnnl
— Jagadeeshwar (@sayaboina_jash) March 28, 2021
हार्दिकने कॅच सोडल्यावर भारतीय संघातील खेळाडूंना विश्वासच बसला नाही. विराट कोहली, रोहित शर्मासह सर्वांना धक्का बसला. डगआउटमध्ये बसलेल्या भारताच्या सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंना विश्वास बसला नाही. स्वत: हार्दिक देखील नाराज झाला. बेन स्टोक्सने गेल्या सामन्यात ५२ चेंडूत ९९ धावा केल्या होत्या. त्यामुळे धोकादायक स्टोक्सला जीवनदान दिल्याची जाणीव हार्दिकला चांगलीच होती. स्टोक्स तेव्हा १६ धावांवर फलंदाजी करत होता.
😭😭😭😭pic.twitter.com/8fLMfjs5Nm
— A (@kyaaboltitu) March 28, 2021
इंग्लंडने वेगाने धाव करत असताना ११ व्या षटकात टी नटराजनच्या चेंडूवर स्टोक्सने शॉट मारला आणि शिखर धवनने यावेळी कोणतीही चूक न करता तो चेंडू पकडला. भारतीय संघाने एक मोठी विकेट मिळवली होती. पण यावेळी सर्वांची नजर हार्दिकने कडे गेली. त्याने सर्व भारतीय खेळाडूंकडे पाहत हात जोडले आणि खाली मैदानावर बसून सर्वांना नमस्कार केला. हार्दिकच्या कृतीवर सर्व भारतीय खेळाडू हसू लागले. त्याच्या या कृतीवर कोहली आणि रोहितला देखील हसू आवरता आले नाही.






