गडचिरोली – येथील खोब्रामेंढा जंगलात जवानांसोबत झालेल्या चकमकीत 5 माओवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. खोब्रामेंढा जंगलात गेल्या 3 दिवसांपासून गडचिरोली पोलिसांच्या सी-60 कमांडो व नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आज जवानांच्या मोहिमेला मोठे यश मिळाले.
खोब्रामेंढा जंगलात आज सकाळपासून माओवादी आणि सी सिकस्टी कमांडोमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत पाच माओवाद्याना कंठस्नान घालण्यात सी सिक्स्टी कमांडोना यश आले. मृतक माओवाद्यांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुष माओवाद्याचा समावेश आहे. घनदाट जंगल असलेल्या या भागात अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे.
तीन दिवसांपासून या भागात जवानांचं अभियान सुरू असून माओवाद्यांचं शिबीर उद्ध्वस्त केल्यानंतर जवानांकडून कोंबिंग ऑपरेशन सुरू होते. दरम्यान, 5 मार्च रोदी महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेजवळील गडचिरोली पोलिसांच्या सी-60 कमांडोच्या नेतृत्वात सुरू असलेल्या अभियानात शुक्रवारी नक्षलवाद्यांच्या शस्त्रांस तयार करणाऱ्या कारखान्याचा भांडाफोड करण्यात आला. गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचं शस्त्र निर्मितीचं युनिट (कारखाना) उद्ध्वस्त केलं.
23 मार्च रोजी छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात जवानांनी भरलेली बस माओवाद्यांनी स्फोट करुन उडवली. या घटनेत 3 जवान शहीद झाले असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. कडेनार ते मंदोडा दरम्यान ही घटना घडली. एकूण 50 च्या आसपास जवान या बसमधून प्रवास करत होते. जखमींना नारायणपूरच्या रुग्णालयात आणण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.






