अमरावती (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरेशी) – ज्या लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्याच्या प्रशासनात काम करण्यासाठी भावी अधिकाऱ्यांची निवड होते, त्याच लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत चक्क भाजपधार्जिणे आणि काँग्रेसविरोधी वातावरण निर्मिती करणारे प्रश्न विचारले जातात, असा आरोप राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी केला आहे. ठाकूर यांनी ही तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेत वादग्रस्त मजकुर होता, असे यशोमती ठाकूर यांचे म्हणणे आहे. या प्रश्नपत्रिकेत केंद्र सरकारसंबंधित एक प्रश्न होता. हा प्रश्न विचारताना भारत सरकार किंवा केंद्र सरकार असा उल्लेख असणे अपेक्षित होते. मात्र त्या जागी चक्क आवर्जून “मोदी सरकार”असा उल्लेख करण्यात आला, असे नमूद करतानाच असा उल्लेख नेमका काय उद्देश आहे?, असा प्रश्न यशोमती ठाकूर यांनी विचारला आहे. लोकसेवा आयोगाला सुद्धा राजकारणाची बाधा झालीय का?, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
याच परीक्षेत पुन्हा काँग्रेसने ब्रिटिश शिक्षण पद्धती स्वीकारली असा तथ्यहीन आरोप करण्यात आला आल्याचे त्या म्हणाल्या. या वरून जाणीवपूर्वक काँग्रेस पक्षाची बदनामी करण्याचा हा कुटील डाव असल्याचे स्पष्ट होत आहे. याचा अर्थ लोकसेवा आयोगाला सुद्धा आता संघाच्या दावणीला बांधण्याचा पद्धतीशीरपणे प्रयत्न होत आहे. त्याचाच हा एक भाग आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
हा सारा प्रकार नकळत घडला असे अजिबात नसून यामागे मोठं षडयंत्र आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी होऊन दोषीवर कारवाई व्हावी, अशीही मागणी पालकमंत्री यशोमतीताई ठाकुर यांनी केली आहे.






