औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – आज (दि.३१) बुधवारपासून सुरु होणारा औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊन रद्द करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली आहे. जिल्हाधिकारी चव्हाण आणि पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. त्यामुळे औरंगाबादकरांची लॉकडाऊनपासून सुटका झाली असून त्यांना दिलासा मिळाला आहे.
औरंगाबादेत ३० मार्च ते ८ एप्रिल अशा १० दिवसांसाठी मर्यादित स्वरुपाचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यानंतर त्यात काहीसा बदल करुन तो ३१ मार्च ते ९ एप्रिल असा करण्यात आला होता. या लॉकडाउनची तयारी प्रशासनाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनी देखील करून ठेवली होती. यासाठी औरंगाबादकरांनी गरजेचे सामान खरेदी करुन ठेवले होते. मात्र, आता लॉकडाऊन रद्द झाला आहे.
आता औरंगाबादेत लॉकडाउन रद्द झाल्याने छोटी दुकाने, बांधकाम व्यवसाय, दुचाकी, तसेच चार चाकी वाहने सुरु राहणार आहेत. त्याच प्रमाणे लग्न समारंभ आयोजित करण्याची परवानगी असून त्यासाठी आखून दिलेले नियम मात्र काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनला विरोधी पक्षाच्या नेत्यांचा तीव्र विरोध होता. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे विरोध दर्शवण्यासाठी सर्वात पुढे होते. उद्योजकांना खुश करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन लावला जात असल्याची टीका जलील यांनी केली होती. त्यांनी लॉकडाउन विरोधात आंदोलनाचा इशाराच दिला होता. ३१ मार्च रोजी लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात आम्ही आंदोलन करू असे त्यांनी जाहीर केले होते. तसेच वैद्यकीय विभागात तातडीने भरती करण्यात यावी अशी मागणीही ते करत होते.या बरोबर भाजप आणि मनसे नेत्यांनीही लॉकडाऊनला विरोध दर्शवलेला होता.






