नाशकात आता भाजी मार्केटमध्ये प्रवेशासाठी द्यावी लागणार ५ रुपये एन्ट्री फी

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील बाजारपेठा आणि भाजी मार्केटमधील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांकडून पाच रुपये प्रवेशशुल्क आकारण्यात येणार असून, नेहरू गार्डन परिसरात याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी नियंत्रण हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी एक नोटिफिकेशन काढले आहे. त्याअनुषंगाने महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये गर्दी नियंत्रित करण्याकरिता सर्वच एण्ट्री आणि एक्झिट पॉइंट बंद करण्यात येतील. प्रत्येकी एक येण्याचा आणि जाण्याचा मार्ग सुरू ठेवण्यात येईल. प्रवेशद्वारावर पाच रुपये शुल्क घेतले जाईल. यातून निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात येईल.

एक तासापेक्षा जास्त वेळ कुणी रेंगाळताना दिसला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवरदेखील कारवाई करण्यात येईल. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महत्त्वाच्या बाजार- पेठांमध्ये याची अंमलबजावणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here