मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) – कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच सध्या राज्यात लॉकडाऊन होणार कि नाही असा प्रश्न सर्वसामान्याना पडलेला आहे. राज्यातील नाशिक जिल्ह्यात करूनच प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तरीही सध्याच्या परिस्थितीत लॉकडाऊन कोणालाही परवडण्यासारखा नाही म्हणूनच नाशिक जिल्ह्यात निर्बंध कडक केले जातील परंतु लॉकडाऊन केला जाणार नाही, असे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले आहे.
नाशिकमधील कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसात 534 रुग्ण वाढले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण हे नाशिक शहरात आढळले आहे. कोरोना रुग्ण वाढीचा वेगही वाढला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये ठोस उपाययोजना करणे बंधनकारक आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे.
जर कोरोना आटोक्यात आला नाही तर नियम तीव्र करु, असा इशाराही भुजबळ यांनी दिला. यापुढे नागरिकांनी मास्क लावला नाही तर 1000 रुपये दंड आकारला जाईल. तसेच त्यांच्या विरुद्ध गुन्हाही दाखल करु, असे छगन भुजबळ म्हणाले.
त्याशिवाय लग्न सोहळा करणाऱ्यांनी पोलीस परवानगी घेणे आवश्यक आहे. गोरज मुहुर्तवरील लग्न टाळा, असे आवाहनही पालकमंत्री यांनी केले. ज्या दुकानात सॅनिटायझर नसेल तर दंड करा, अशा सूचनाही मनपा अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. तसेच शाळा जैसे थे सुरु राहणार आहेत. येत्या 8 दिवस बघून शाळांबाबत निर्णय घेऊ, असेही भुजबळांनी सांगितले.







