सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – नियमांचे उल्लंघन करत बावधान (ता. वाई) ची बगाड यात्रा हजारो भविकांची उपस्थितीत पार पडली. प्रशासनाने यात्रेवर बंदी घातली असतानाही आदेशाचे उल्लंघन करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा पार पडल्याबद्दल शंभरहून अधिक ग्रामस्थांना पोलिसांनी जेलयात्रा घडविली आहे.
बावधनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व यात्रेच्या निमित्ताने गावांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण गावाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला आहे. तरी देखील भैरवनाथाच्या यात्रेचे बगाड शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडले. बगाड मिरवणुकीत हजारो ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती.
बावधन (ता वाई) येथील भैरवनाथाची बगाड यात्रा दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी होते. यावेळी गावामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने व यात्रेच्या अनुषंगाने गर्दी वाढू नये म्हणून गाव संपूर्ण गाव परिसर प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेला होता. मागील आठ दिवसापासून गावातील सर्व व्यवहार बंद होते. बगाड यात्रा होऊ नये यासाठी प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूरकर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितल जानवे खराडे, तहसीलदार रणजीत भोसले, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर आदींनी गावामध्ये अनेक बैठका घेऊन ग्रामस्थांनी कोरोना काळामध्ये यात्रेला घातलेल्या बंदीबाबत जनजागृती करत बगाड मिरवणूक करू नये, असे आवाहन केले होते.
संपूर्ण राज्यात बावधनची भैरवनाथ बगाड मोठी व एकमेव यात्रा म्हणून ओळखली जाते. मात्र शुक्रवार पहाटे अचानक ग्रामस्थांनी बगाड रथ बांधून कृष्णा तीरावरून आणून तेथून वाजत गाजत गावात आणला. होळी पौर्णिमेच्या रात्री भैरवनाथ मंदिरात बगाड्या कौल लावून ठरविला जातो. दगडी चाके असलेला व संपूर्ण लाकडमध्ये बांधलेल्या बगाड रथाला बैलांच्या साह्याने ओढले जाते. एका वेळी किमान बारा ते सोळा बैल जोडून हा गाडा ओढला जातो. शुक्रवारी बगाड यात्रेला ग्रामस्थांनी मोठी गर्दी करत बगाडाचा रथ गावात बैलांच्या साहाय्याने गावात आणला. प्रशासनाने पहाटेच्या सुमाराला कृष्णा तीरावरील सोनेश्वर येथे ग्रामस्थांना बगाड मिरवणूक काढू नये, अशी विनंती पुन्हा एकदा केली. मात्र या बंदीला सुधारक झुगारत ग्रामस्थांनी मिरवणूक बगाड मिरवणूक काढली. किमान दहा हजार भाविक या यात्रेत सहभागी झाल्याचे दिसून आले. मागील वर्षी यात्रेवर बंदी घातली होती. तरीही यात्रा केल्याने यात्रा कमितीवर गुन्हा दाखल केला होता.
सकाळपासून अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील परिस्थितीचा आढावा घेत यात्रेमध्ये होते. त्यांनी स्वतः बावधनमध्ये येऊन परिस्थितीची व यात्रेची पाहणी केली. प्रशासनाचा व ग्रामस्थांचा संघर्ष टाळण्यासाठी बगाड रथ प्रशासनाने गावात येऊ दिला. यानंतर पोलिसांनी गावात नियम भंग केल्याप्रकरणी धरपकडीचे सत्र सुरू केले असून आतापर्यंतचे शंभरावर लोकांना अटक करुन जेलयात्रेला पाठवलं आहे.






