लॉकडाऊन करण्यापेक्षा सरकारने आम्हाला आमच्या नशीबावर सोडावे – राजू शेट्टी

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असताना कोणत्याही क्षण लॉकडाऊन करण्यात येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील आढावा बैठकाही घेतल्या. भाजप, मनसेसह अन्य पक्षांनी राज्यातील लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही लॉकडाऊनला विरोध केला आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ राजू शेट्टी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजू शेट्टी यांनी लॉकडाऊनला तीव्र विरोध दर्शवला. लॉकडाऊन काळात मोठा भ्रष्टाचार झाला. ४ रुपयांचा मास्क ४० रुपयाला विकला जातो. हे नेमके काय आहे, हे सरकारने सांगायला हवे. गेल्या वर्षीचे बजेट कोरोनासाठी वापरले, त्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्याचा हिशोब सरकारने द्यावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.

आधी शेतमालाला किंमत द्या. रोजगार बुडणार आहे, त्यांना भरपाई द्या. ज्यांचा व्यवसाय बुडाला, त्यांना भरपाई द्या आणि मगच लॉकडाऊन करा. आमचे काही म्हणणे राहणार नाही. नुसतं लॉकडाऊन करतो म्हणणे योग्य नाही. त्यापेक्षा सरकारने आम्हाला आमच्या नशीबावर सोडावे. आमचे आम्ही पाहून घेऊ, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

दरम्यान, शेट्टी यांच्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. महाविकास आघाडी सरकारवर शेट्टी यांनी जोरदार टीका केली. महाविकास आघाडीतिल प्रमुख तीनही पक्षाची भूमिका पटत नसल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात भाजपने समाधान आवताडे यांना मैदानात उतरवले आहे. तर स्वाभिमानीने सचिन पाटील यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here