दहावी-बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच ऑफलाइन होणार

ssc-exam
संग्रहित छायाचित्र

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या हेतूने दहावी-बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार आहेत. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता परीक्षेची तयारी करावी. परीक्षेसाठी गावागावांमध्ये केंद्र असणार असून यंदा विद्यार्थ्यांना ते शिकत असलेल्या शाळा, महाविद्यालयातच परीक्षा देता येईल, अशी माहिती पुणे बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.

कॉपी पथक करणार नाही विद्यार्थ्यांची तपासणी
परीक्षेपूर्वी पर्यवेक्षक असलेल्या सर्वच शिक्षकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. कोरोनामुळे यंदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर परीक्षेत कॉपी करून लिहू नये म्हणून दरवर्षी शिक्षण विभागाकडून विशेष पथकांची नियुक्‍ती केली जाते. यंदा तशा पथकांची नियुक्‍ती होईल, परंतु त्यांना विद्यार्थ्यांची तपासणी त्यांना करता येणार नाही. कॉपी करून विद्यार्थी लिहणार नाहीत, यावर वॉच ठेवता येईल, असे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्याचा कडक उन्हाळा, त्यानंतरचा पावसाळा आणि या काळात विविध जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलणे कठीण असून विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशांचे वेळापत्रकही कोलमडणार आहे. या पार्श्‍वभूमवर परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असून बारावीचा पहिला पेपर 23 एप्रिलला तर शेवटचा पेपर 21 मे रोजी होईल. बारावीसाठी राज्यभरातून 14 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. दुसरीकडे दहावीच्या विद्यार्थ्यांचा पहिला पेपर 29 एप्रिलला असून 29 मे रोजी शेवटचा पेपर असेल. दहावीसाठी राज्यातून अंदाजित 16 लाख विद्यार्थी बसले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने कडक लॉकडाउनची शक्‍यता वर्तविली जात आहे. तरीही परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असून त्यावेळी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य राहील, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, परीक्षा केंद्रांची संख्या वाढल्याने अतिरिक्‍त पर्यवेक्षक नियुक्‍त केले जाणार असून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अतिरिक्‍त वेळही देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here