मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – ‘सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. स्वच्छ प्रशासन हा माझा प्रयत्न राहील, प्रशासनात माझा कुठला राजकीय हस्तक्षेप असणार नाही’ असं म्हणत राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. तसंच राज्य सरकार सर्वोच न्यायालयात आव्हान देणार आहे, अशी घोषणाही वळसे पाटील यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा पदभार देण्यात आला आहे. आज दुपारी दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला असून कामाला लागले आहे. पत्रकारांशी बोलत असताना दिलीप वळसे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
‘कोविड काळात सर्व पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. या जबादारी बरोबर ते कायदा सुव्यवस्था देखील सांभाळत आहेत. सर्व धर्मियांचे सण याच महिन्यात मोठया प्रमाणात आहे. आमच्याकडून सर्वसामान्य जनता, महिला यांना मोठ्या आशा आहेत. पण सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे’, अशी ग्वाही वळसे पाटलांनी दिली.
‘आजी माजी अधिकारी यांचा सल्ला घेतला जाईल. स्वच्छ प्रशासन हा माझा प्रयत्न राहील. प्रशासनात माझा कुठला राजकीय हस्तक्षेप असणार नाही. प्रस्थापित शक्ती कायदा, पोलीस सक्षमिकरण, कायदा सुव्यवस्था हे प्राधान्य दैनंदिन ब्रिफिंग साठी स्वतंत्र यंत्रणा असणार आहे’, असंही वळसे पाटलांनी सांगितले. ‘अनिल देशमुख यांच्याबद्दल उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे. त्याचे पालन केले जाईल. सीबीआयला सर्व सहकार्य राहील. राज्य सरकार सर्वोच न्यायालयात आव्हान देणार आहे’, असंही वळसे पाटलांनी स्पष्ट केले.
‘गृह विभाग हा एक काटेरी मुकुट आहे. याआधीही जबाबदारी पार पडली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय आहे आणि राहील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेणार आहे, असं पाटील म्हणाले. ‘काल अचानक पक्षाने ही जबाबदारी दिली. अधिकाऱ्यांची निष्ठा कोणाशी आहे ती समोर आली की निर्णय घेणार आहे. माजी मुख्यमंत्री यांनी 5 वर्ष गृहमंत्रिपद सांभाळलं आहे, त्यांचे अनेक अधिकारी यांच्यासोबत संबध असू शकतात, असं सूचक विधानही त्यांनी केलं.






